१५ वर्षांच्या मुलीला पळवून मुंबई पोलिसांना चॅलेन्ज देणाऱ्याला ठोकल्या बेड्या
बिहारमध्ये आरसीएफ पोलिसांची कारवाई
मुंबई : चेंबूरच्या वाशी नाका परिसरातून १५ वर्षांच्या मुलीला पळवणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मला पकडून दाखवा, असे चॅलेन्ज फोन करून आरोपी पोलिसांना देत होता. त्याच्या अटकेसाठी आरसीएफ पोलिसांनी (Mumbai police) बिहार राज्यात तळ ठोकला व वेशांतर करून त्याला ताब्यात घेतले व मुलीची सुटका केली.
चेंबूर परिसरात राहणारी मुलगी पाणी भरण्यास नळ चालू करण्यास जाते, असे सांगून घराबाहेर गेली. बराच वेळ झाला तरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला तरी ती भेटली नाही, अखेर तिच्या आईने आरसीएफ पोलीस ठाणे गाठले. मुलगी बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिसांनी (गु.र.क्र. 492/2023 कलम 363 भा.दं.वि) गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुलीची आई काम करत असलेल्या जरीच्या कारखान्यातील काम करणाऱ्यांची चौकशी केली असता नरेश राय (३०) हा मुलगी बेपत्ता झालेल्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तो दिल्ली, बिहार, काठमांडू आदी ठिकाणी लपून बसत होता. त्यादरम्यान त्याने पोलिसांना फोन करून पकडून दाखवा, असे खुले आव्हान दिले. तपास सुरू असताना आरोपी नरेश बिहार राज्यात आल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार परिमंडळ ६ चे उपायुक्त हेमराज सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, आरसीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे व पोलीस उपनिरीक्षक खपाले, हवालदार अनिल घरत, प्रितम पाटील हे बिहारमध्ये दाखल झाले. दोन दिवस तेथील अमिठापुरा परिसरात हुबेहूब बिहारी माणसांप्रमाणे वेशांतर करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने नरेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
तेथील स्थानिक न्यायालयात आरोपी नरेश राय याला हजर करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले. या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी भादंवि कलम 376,376(2),(n),4,8,12 पोस्को कायद्यांतर्गत नोंद केली आहे. तसेच बळीत मुलीची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे.