उदय आठल्ये
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे जयश्री देसाई! जातीधर्म, लहानमोठा गरिब-श्रीमंत भेदभाव न करता केवळ कर्तव्य बजावण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या जयश्री देसाई यांनी स्मितभाषी, प्रेमळपणे स्वभावामुळे जिथे नियुक्ती झाली तेथील नागरिकांची आणि सहकाऱ्यांची कायम मन जिंकली. सध्या त्या कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांचा आतापर्यंतच्या जीवन प्रवासाचा ‘पोलीस मित्र’ तथा ‘पोलीस वार्ता’चे संपादक उदय आठल्ये यांनी घेतलेला आढावा.
अल्प परीचय
आई अलका, वडील ज्ञानदेव देसाई या दाम्पत्याच्या पोटी जयश्री यांचा जन्म झाला. वडील प्राध्यापक तर आई गृहिणी आहेत. त्यामुळे जयश्री यांच्यावर लहानपणापासून उत्तम संस्कार झाले. बालवयात घरातून शिक्षणाची प्रेरणा त्यांना मिळाली.
शालेय जीवनातील प्रवास
जयश्री देसाई यांचे एम.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि सन 2011 साली जयश्री देसाई एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिल्या आल्या. जिद्द चिकाटी यश मिळवून देते हा आत्मविश्वास बाळगून देसाई यांनी आईवडिलाचे स्वप्न साकारले.
खाकीचा प्रवास
जयश्री देसाई यांनी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची २०१२-१३ या कालावधीत रत्नागिरी येथे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेथे त्यांनी रत्नागिरीमधील महीला वर्गासाठी विशेष प्राविण्य दिले. रत्नागिरीतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 2013 ते 2015 या कालावधीत त्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे कर्तव्याला होत्या. तेथे अनेक दरोड्यांच्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी यशस्वीपणे केला. शाळा व महाविद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण दिले. त्यानंतर सन 2015 ते 2018 या कालावधीत पोलीस उप अधीक्षक जून्नर येथे त्यांची नियुक्ती झाली. या काळात बेकायदेशीर धंद्यावर जयश्री यांनी अनोख्या स्टाईलने कारवाई करत क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले.
सन 2018 साली त्यांची जातपडताळणी समिती, सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. प्रलंबित सर्व प्रकरणांचा तत्काळ तपास केला. सातारचा काळ पार केल्यानंतर पदोन्नती मिळाल्याने त्यांना महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले. तेथे त्यांनी आयटी विभागाचे कामकाज पाहिले. ई-लर्निंग मोड्युलेस तयार केले. तसेच त्यांनी डिव्हायएसपी बॅच क्रमांक 28 चे कोर्स डायरेक्टर म्हणून काम पाहिले. दरम्यानच्या काळात आलेल्या करोना संकटात त्यांनी एमपीएतील प्रशिक्षणार्थीना ऑनलाइन प्रशिक्षण देखील दिले.
सन 2020 ते 2022 साली रत्नागिरी येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली. शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात जयश्री देसाई यांची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे.त्यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा पदभार घेतला. कोल्हापूर वासियांना कार्यशैलीची चुणूक दाखवित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले आहे यात तिळमात्र शंका नाही..
पोलीस दलात निष्कलंक कारकीर्द
पोलिस खात्यात महिलाही चांगले काम करतात हे त्यांनी आपल्या कर्तव्यातून सिद्ध केले. स्वच्छ प्रतिमा, कुठल्याही वादात न राहता आपले कर्तव्य पार पाडु शकतो, अशी जयश्री देसाई यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. कर्तव्यदक्षतेमुळे महाराष्ट्र पोलीस दलात जयश्री देसाईंनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
आपल्या कर्तव्याला मनापासून सलाम
महाराष्ट्र पोलीस दलात खाकी वर्दीतील महिला अधिकाऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे.श्रीमती जयश्री देसाई यांच्या बद्दल बोलेल तितके कमीच आहे. मनमिळावू शांत संयमी स्वभावामुळे कर्तव्याच्या ठिकाणी त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. कर्तव्य बजावताना निष्कलंक सेवा बजावताना दिसत आहेत, हे महिला वर्गासाठी व महाराष्ट्र पोलीस दलासाठी उपयुक्त आहे. अशा खाकीतल्या कर्तव्यदक्ष जयश्री देसाई यांना पुढील कर्तव्यासाठी मनापासून शुभेच्छा.