देशभरातील २१४ शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
उदय आठल्ये
ठाणे : लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रीग या ठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ साली १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. याला पोलिसांनीही सडेतोड उत्तर दिले. शेवटच्या क्षणापर्यंत चिनी सैनिकांशी झुंज दिली. मात्र, या हल्यात दहाही पोलीस शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला होता. या पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना कर्तव्य बजावण्यासाठी बळ मिळण्यासाठी २१ आॅक्टोबर हा दिन पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
शहीद पोलिसांच्या कर्तव्याला उजाळा देण्यासह त्यांना मानवंदना देण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सकाळी ८.०० वाजता स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यान, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण कार्यालयाजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आजवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या देशभरातील २१४ शहिदांना मानवंदना देण्यात आली. त्यात ठाणे पोलीस दलातील भालचंद्र दत्तात्रय कर्डिले, रमेश यशवंतराव जगताप, बाळू सुकदेव गांगुर्डे, तुकाराम यशवंत कदम यांचाही समावेश आहे.
या प्रसंगी भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त भुजगराव मोहिते, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधिकारी, अंमलदार, स्वातंत्र सेनानी, सामाजिक कार्य करणाºया प्रतिष्ठीत व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व शहीद पोलिसांचे नातेवाईक उपस्थित होते.