मुंबईच्या नेहरू नगर पोलिसांनी रोखली आत्महत्येची घटना
मुंबई : मुंबईचे पोलीस स्मार्ट कर्तव्य बजावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याला निमित्त ठरले नेहरू नगर पोलीस! संकटाच्या वेळेस नेहमी तत्पर असलेल्या ५ नंबरच्या गाडीवर कर्तव्याला असलेल्या पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जाऊन आत्महत्या करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला रोखले. २ मिनिटं पोलीस उशिरा पोहोचले असते तरी महिलेने गळफास घेतलाच असता.
नेहमीप्रमाणे नेहरूनगर पोलीस आपापल्या कामात व्यस्थ होते. त्यावेळी मुख्य नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश आला. ‘तुमच्या हद्दीत महिला कौटुंबिक वादातून साडीने गळफास लावून घेत आहे’ हे ऐकताच पाच नंबरच्या गाडीवर कर्तव्याला असलेले महिला अंमलदार पोळ व हवालदार साबळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचल्या व तेथे पाहतात तर महिला आत्महत्याची पूर्ण तयारी घरात करून ठेवली होती. पोलिसांनी त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. तिला सुखरूप बाहेर आणून पोलीस ठाण्यात नेले व ड्युटी इन्चार्ज पो.उप.नि सागर पाटील यांनी पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची समजूत काढून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले.