मध्य प्रदेशच्या बेपत्ता महिलेची सुखरूप घरवापसी
अवघ्या ७ मिनिटांत मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी महिलेला शोधले
मुंबई : मुंबई पोलीस दल कायम सतर्क असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेचा अवघ्या ७ मिनिटांत वांद्रे पोलिसांनी शोध घेतला. कायदेशीर बाबींची पूर्तता करून तिला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पारुल चौकसे (वय ३८) ही १७ ऑक्टोबर रोजी फिरायला जाते, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कोठेच भेटली नाही. अखेर पारूल बेपत्ता झाल्या प्रकरणी एमपीतील कोतवाली नरसिंहपूर पोलिसांनी मीसिंगची नोंद केली. ती मुंबईत असल्याची माहिती तेथील पोलिसांना समजली. त्यानुसार तिचे नातेवाईक मुंबईत आले मात्र, ती भेटली नाही.
दरम्यान, ३ नोव्हेंबरला पारुल हिने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबियांना फोन केला. मात्र, फोनवर काहीएक बोलली नाही. चौकसे कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी कोतवाली नरसिंहपूर पोलिसांना सांगितले. त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता मुंबईतून फोन आल्याचे निष्पन्न झाले. कोतवाली नरसिंहपूरच्या पोलिसांनी त्वरित ‘ऑल इंडिया पोलीस ग्रुप’वर बेपत्ता महिलेची माहिती पोस्ट केली. ही माहिती वाचताच क्षणी रात्रपाळीला कर्तव्यावर असलेले वांद्रे पोलिस ठाण्याचे सपोनि सुधीर यादव व पीएसआय रिता जाधव यांनी वांद्रेतील गॅलेक्सी येथे जाऊन पारुलला ताब्यात घेतले. ती भेटल्याची माहिती एमपीच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार तेथील पोलिसांचे पथक व चौकसे कुटुंबिय मुंबईत आले व पारुल हिला घरी घेऊन गेले.
अशा प्रकारे सात मिनिटांत बेपत्ता महिलेचा शोध घेतल्याने मध्य प्रदेश पोलिसांनी मुंबईच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे कौतुक केले.