मुंबईत रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मोहीम; ४२६ रिक्षा जप्त, २०९९ प्रकरणांवर कारवाई
मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरुद्ध २९ नोव्हेंबर २०२४ पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत २०९९ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्या ४२६ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई विना परवाना, विना गणवेश, फिटनेस प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, अवैध प्रवासी बोलावणे, नियोजित पार्किंग क्षेत्राबाहेर रिक्षा उभे करणे आणि भाडे नाकारणे अशा प्रकारांवर केंद्रित आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीस विभागाने यापुढेही अशी मोहीम नियमितपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध तक्रारीसाठी १००, १०३ किंवा ११२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे.