सावधान ! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मिठात काळाबाजार !
ब्रँडेड कंपनीच्या नावाने होणाऱ्या विक्रीचा सीबी कंट्रोलने केला पर्दाफाश
मुंबई : शॉर्टकटने पैसा कमावण्यासाठी भामटे नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे मुंबई पोलीस दलाच्या सीबी कंट्रोलने पुन्हा एकदा उघडकीस आणले. भारतातील नागरिकांचे सर्वाधिक पसंतीचे शुद्ध मीठ विकणाऱ्या कंपनीच्या पिशव्या छापून बोगस मीठ विकणाऱ्यावर कांदिवली परिसरात कारवाई करण्यात आली. बोगस मिठाची अनेक दिवसांपासून मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये (Black market of salt in Mumbai, Thane, Palghar) विक्री होत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
१ हजार ३२५ किलो मिठाचा साठा जप्त

कांदिवली परिसरात नामांकित कंपनीच्या नावाखाली मीठ विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार सीबी कंट्रोलच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी एक व्यक्ती पिशव्यांमध्ये मिठाची पॅकिंग करताना आढळून आला. या कारवाईत ५३ पिशव्या, १ हजार ३२५ किलाे मीठ असा एकूण ३७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात ( Kandivali Police stn CR no.145/24,) व EOW, Mumbai, vide CR No. 18/24, u/s. section 420,34 ipc r/w 51,63 of Copyright Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पुढील कारवाई सुरू असल्याने आरोपीचे नाव गुपित ठेवले आहे)
या पथकाला सलाम!
नारिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या गुन्ह्याचा पर्दाफाश मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त निशीत मिश्र, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोषकुमार बाग्येहळ्ळली, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती देवकुळे, हवालदार विशाल यादव, संतोष पाटील, अमित वलेकर, महेश नाईक, गणेश डोईफोडे यांनी केला.
कसे ओळखाल बोगस साहित्य…
या कारवाई जप्त केलेल्या मिठाच्या पिशव्यांवरील छपाईसाठी वापरलेली शाई पुसट होती. नावातही बराच फरक होता. नामांकित कंपनीच्या पिशव्यांवर प्रत्येक प्रोडकचा विशेष बारकोड असताे. मात्र बनावट पिशव्यांवर एकच कोड होता.